लोकशाहीचा गळा आवळला की मॅच फिक्सिंग? राज्याच्या ८ महापालिकांत २२ उमेदवार ‘बिनविरोध’; विरोधकांच्या लाचाराने ‘मविआ’चे अस्तित्व धोक्यात!
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले खरे, पण मतदानापूर्वीच लोकशाहीची विदारक थट्टा सुरू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. अर्ज मागे घेण्याच्या अवघ्या २४ तास आधी राज्यातील ८ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये तब्बल २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सत्ताधारी महायुतीने मुसंडी मारली असताना, ‘लोकशाही वाचवा’ची ओरड करणाऱ्या महाविकास आघाडीची (MVA) ‘शमशान शांतता’ अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
केडीएमसीत ‘मैत्रीपूर्ण’ शरणागती?
ठाणे जिल्ह्याचे राजकारण नेहमीच तापलेले असते, मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) जे घडले ते पाहून राजकीय जाणकारही थक्क झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने ५ जागांवर ‘बिनविरोध’ विजयाचा शंखनाद केला आहे. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही ४ उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.
प्रभागातील मतदारांना मतदानाचा हक्क मिळण्यापूर्वीच जर ९ नगरसेवक निवडून येत असतील, तर तिथे विरोधक नक्की करत काय होते? असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांची ‘पॉवर’ केवळ ठाणे-कल्याणच नव्हे, तर अहिल्यानगरमध्येही हीच लाट पाहायला मिळाली. येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २ उमेदवार बिनविरोध निवडून आणत आपली पकड मजबूत केली आहे. राज्यातील ८ महापालिकांमध्ये पसरलेला हा ‘बिनविरोध’चा संसर्ग लोकशाहीसाठी पोषक आहे की घातक, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.
महाविकास आघाडीचा ‘छुपा पाठिंबा’ की ‘मॅच फिक्सिंग’?
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे विरोधकांची भूमिका. ज्या महाविकास आघाडीने संविधान वाचवण्याच्या गप्पा मारल्या, ती आघाडी आज आपल्याच उमेदवारांचे अर्ज बाद होताना किंवा उमेदवार मैदानातून पळ काढताना मूग गिळून गप्प का आहे? प्रश्न 1: निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावावर ‘मविआ’चे नेते तोंड का उघडत नाहीत? प्रश्न 2: हे सर्व ‘गैर-संविधानिक’ कृत्य शांतपणे स्वीकारून मविआ सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी तर करत नाही ना?
जनतेच्या मताचा अधिकार कोणी हिरावला?
निवडणूक म्हणजे जनतेला आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी असते. मात्र, अर्ज मागे घेण्यापूर्वीच जर निकालाची औपचारिकता उरली असेल, तर हे जनतेच्या मताधिकारावर झालेले आक्रमणच आहे. महाविकास आघाडीची ही लाचारी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेला घेऊन जाणार? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विरोधकांच्या या मौनामुळे “सत्ताधाऱ्यांशी साटंलोटं करून लोकशाहीचा बळी दिला जातोय का?” अशी टीका आता जनमानसातून होत आहे.





