नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी
जगभरात अमेरिका–इराण–इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलसंकटाची भीती व्यक्त होत असताना भारतातही इंधन दरवाढ, तुटवडा आणि महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारने बांगलादेशला तब्बल ५ हजार टन डिझेलचा पुरवठा केल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारच्या धोरणावर तीव्र टीका होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार हा डिझेल पुरवठा पाईपलाईनमार्गे करण्यात आला. परंतु देशातच इंधनाच्या किंमती वाढत असताना आणि ग्रामीण भागात डिझेल-पेट्रोल मिळण्यात अडचणी निर्माण होत असताना परदेशाला मदत देण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधक आणि सामाजिक माध्यमांवर सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये सरकारच्या भूमिकेवर जहरी शब्दांत टीका करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार कठीण काळात जिथे सार्वजनिकरीत्या हिंदूंच्या हत्या झाल्या त्या बांगलादेशला ५ हजार टन डिझेल पुरवते, हे कसलं हिंदुत्व?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
टीकाकारांचे म्हणणे आहे की, देशातील शेतकरी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिक इंधन दरवाढीने होरपळत असताना परदेशाला मदतीचा हात देणे हा निर्णय जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. “देशातील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी सरकार परराष्ट्र धोरणाच्या नावाखाली राजकीय प्रतिमा उभी करत आहे का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे सरकारच्या समर्थकांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऊर्जा सहकार्य करारानुसार हा पुरवठा करण्यात आला असून त्यामुळे द्विपक्षीय संबंध मजबूत होतात. परंतु या स्पष्टीकरणानंतरही देशांतर्गत इंधन संकट आणि महागाई या मुद्द्यांवरून सरकारवर टीकेची झोड उठत आहे.
सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेलबाजार अस्थिर असताना भारताने घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा रंगली आहे. अनेक नागरिकांचा प्रश्न मात्र एकच — “आधी देश की परदेश?”





