- पालघर हादरले! मासवण आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेनंतर महिलांना थंडीत फरशीवर झोपवले; आरोग्य यंत्रणेचा निर्दयी चेहरा समो

पालघर: ‘आरोग्यम् परमं धनम्’ असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा खरा आणि विदारक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या आदिवासी आणि गरीब महिलांना शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत चक्क उघड्या फरशीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर अधिवेशनात जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले गेल्यानंतरही प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
ब्रीदवाक्य नावाला, अवहेलना पाचवीला!
केंद्र सरकारचे महत्त्वाचे धोरण असलेल्या कुटुंब नियोजन मोहिमेअंतर्गत पालघरमध्ये नसबंदी पंधरवडा राबवण्यात आला. या मोहिमेत हजारो महिलांनी प्रतिसाद दिला. मात्र, मासवण येथील ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ या केंद्रात शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर या महिलांना बेड उपलब्ध करून देण्याऐवजी सिमेंटच्या थंडगार जमिनीवर झोपवण्यात आले.
बाहेर कडाक्याची थंडी असताना, शस्त्रक्रिया झालेल्या संवेदनशील अवस्थेतील महिलांना अशा प्रकारे वागणूक देणे, हा त्यांच्या मानवाधिकाराचा आणि आरोग्याचा गंभीर अपमान मानला जात आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेचा ‘निष्काळजीपणाचा’ इतिहास
हा पालघरमधील पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी २०२१ मध्ये सफाळे आरोग्य केंद्रातही असाच संतापजनक प्रकार घडला होता.
२०२१ ची घटना: दारशेत आणि सोनावे येथील ५३ महिला व त्यांच्या लहान मुलांना तब्बल १० तास उपाशी पोटी ठेवण्यात आले होते.
वर्तमान स्थिती: सद्यस्थितीत जिल्ह्यात २,८४२ महिलांच्या शस्त्रक्रिया पार पडल्याचा दावा प्रशासन करत असले, तरी त्यांना मिळणाऱ्या सुविधा मात्र शून्य आहेत.
“शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.”
— डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी (पालघर)
प्रशासनाचे मौन आणि संतापलेला पालघर
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केवळ सूचना देऊन हात झटकले आहेत, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती भीषण आहे. नागपूरच्या अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघाल्यानंतरही यंत्रणा इतकी निर्दयी कशी असू शकते? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. आदिवासी महिलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार कधी, हाच खरा प्रश्न आहे.





