मुंबई | प्रतिनिधी
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने विविध जयंती व स्मरणदिन कार्यक्रमांसाठी मंजूर केलेल्या निधीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. विभागाने २ जुलै रोजी जारी केलेल्या मंजुरीनुसार, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमासाठी केवळ १० लाख रुपये, तर डॉ. केशव बळीराम हेडगेवार जयंती कार्यक्रमासाठी तब्बल ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयावरून सरकारच्या प्राधान्यक्रमावर विरोधक व विविध सामाजिक संघटनांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“निवडणुकीत छत्रपतींच्या नावाचा जयघोष, पण सत्तेत आल्यावर विचारधारेचे उदात्तीकरण?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अवघ्या १४ व्या वर्षी संस्कृतमध्ये चार ग्रंथांची निर्मिती करणारे, औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याशी तब्बल नऊ वर्षे लढा देणारे, स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जयंती कार्यक्रमासाठी केवळ १० लाख रुपयांचा निधी देण्यात येणे हे अनेकांच्या मते अत्यंत दुर्दैवी आणि अपमानास्पद आहे.
दुसरीकडे, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंती कार्यक्रमासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने सरकारच्या सांस्कृतिक धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. जनतेच्या कररूपाने जमा झालेला पैसा हा सर्व महापुरुषांचा सन्मान आणि समाजहितासाठी खर्च व्हावा की एका विशिष्ट विचारधारेच्या उदात्तीकरणासाठी? अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे.
या निधीतील मोठी तफावत पाहता, सरकारच्या निर्णयामागील निकष काय आहेत, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीला दुय्यम स्थान आणि दुसऱ्या कार्यक्रमाला चौपटपेक्षा अधिक निधी देण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.






