
वसरणी गावाकरता भुयारी मार्ग करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन
नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी दिली आंदोलनास भेट
नांदेड – राष्ट्रीय महामार्ग 361 वरील नवीन नांदेडातील वसरणी येथे भुयारी मार्ग करण्यात यावा या मागणीसाठी वसणी येथील गावकऱ्यांनी 2 ऑगस्ट पासून राष्ट्रीय महामार्गावरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव शुध्दोधन कापसीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनास नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांनी भेट देऊन या विषयासंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले.
या महामार्गावरील नवीन नांदेड वसरणी हे गाव राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिण-उत्तर दोन्ही बाजूंनी विभागले गेले आहे. या गावची लोकसंख्या दक्षिण भागाला पाच ते सहा हजार तर उत्तरेला मूळ गावात आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे दोन्ही बाजूनी होणारी दररोजची ये-जा पूर्णपणे बाधित होणार आहे हा महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही पर्याय व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे कामाला जाणारे कामगार,मूळ गावात जि.प.शाळा असल्यामुळे तिथे जाणारे शाळकरी विद्यार्थी, दक्षिण भागात असलेले शेतीमुळे गावातून जाणारे गुरे-ढोरे या सर्वांना दक्षिणेकडून उत्तरेकडे ये-जा करण्यासाठी महामार्ग ओलांडून जावा लागणार आहे.
नांदेड आकाशवाणी केंद्र हे केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची प्रसारण संस्था येथे असताना पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने केली नाही.
राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना वाहनांचा वेग पाहता भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातून या ठिकाणी जीवितहानी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंत्यविधीचे ठिकाण राष्ट्रीय महामार्गाच्या उत्तर बाजूस आहे. त्याचबरोबर गावातील तीर्थस्थळे (मंदिर विहार,मस्जिद) हे मूळ गावात असल्यामुळे दररोज ये-जा करण्यासाठी हा महामार्ग धोकादायक ठरू शकतो. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हलके वाहनासाठी अंडरपास दिला जाऊ शकतो तसेच गुरेढोरे पादचाऱ्यांसाठी अंडरपास आणि पादचाऱ्यांसाठी पूल सुद्धा प्रदान केला जाऊ शकतो. तसेच शाळा,रुग्णालय, कारखाना यापासून 200 मीटर अंतरावर पादचाऱ्यांसाठी अंडरपास ब्रिज उपलब्ध केला पाहिजे अशी तरतूद आहे.
यापूर्वीही 20 जुलै रोजी निदर्शने करून वसरणीकरांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधले होते. मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्यासह शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख विनय गिरडे, नांदेड शहर प्रमुख तुलजेश यादव, नवीन नांदेड प्रमुख सुहास खराणे यांच्यासह सेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोंडारकर यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण या प्रश्नावर दिल्ली दरबारी गडकरी यांची भेट घेणार असल्याची स्पष्ट केले.
या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीची शुद्धोधन कापसीकर, महेंद्र सोनकांबळे, भालचंद्र मोळके, सुधाकर भिसे, महेश गजभारे, अंशुमन गजभारे चंद्रभागा कापसीकर, वंदनाबाई ढवळे, जनाबाई पोवळे, शांताबाई पोवळे, रावसाहेब खराणे, लक्ष्मण काळे, लताबाई शिंगाडे यांच्यासह शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती. या आंदोलनादरम्यान नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला आहे.





