जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची गर्दी
तक्रारी तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना
वर्धा, : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आपल्या समस्या, तक्रारी, निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी महसूलमंत्र्यांनी थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या, म्हणणे जाणूण घेतले आणि त्यावर कालमर्यादेत कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमास आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार,आ. राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्या स्थानिक स्तरावरच निकाली निघणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर नियमित लोकशाही दिन घेतल्यास मोठ्या प्रमाणात समस्यांचे निराकरण करता येईल. शासकीय विभागांनी समन्वयाने काम करुन प्रश्न निकाली काढावेत. प्राप्त निवेदने, तक्रारी कालमर्यादेत निकाली काढा. शासनस्तरावरील प्रकरणांसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा, त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले.
वन्य प्राण्यांपासून नागरिकांचे संरक्षणासाठी अत्याधुनिक अलार्म सिस्टम लावा, त्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या प्रत्येक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय मी याठिकाणाहून हलणार नाही, असे महसूल मंत्र्यांनी सुरूवातीलाच सांगितले, त्याप्रमाणे त्यांनी सर्वांचे समस्या व निवेदने स्वीकारली.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, वर्धा शहरातील साने नगर, रामनगर येथील नागरिकांच्या समस्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल आणि गजानन नगर वासियांप्रमाणे त्यांच्याही समस्याही लवकरच निकाली काढण्यात येतील, असे ते म्हणाले. जनसंवादात आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची सुरुवातीला नोंदणी करण्यात आली. तक्रार नोंदविलेल्या नागरिकांच्या समस्या स्वतः श्री.बावनकुळे यांनी ऐकून घेतल्या. दाखल तक्रारींवर वेळेत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सातत्याने पाठपुरावा करुन निकाली काढलेल्या गजानन नगर पिपरी मेघे येथील नागरिकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते
भुखंड वाटप करण्यात आले. यावेळी वनहक्क पट्टे, नझूल भूखंड वाटप, जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना सातबारा वितरण आदींचे वाटप करण्यात आले.





